तुम्ही गद्दारच, हा शिक्का पुसता येणार नाही - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2022

तुम्ही गद्दारच, हा शिक्का पुसता येणार नाही - उद्धव ठाकरे



मुंबई - शिवसेनेतून गद्दारींनी केली, मंत्रीपद काही वेळेपुरतेच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता तो ५० खोक्यांचा बकासूर झाला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक सोबत होते. अमित शाह बोलले की असे काही ठरलेच नव्हते. पण मी शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे असे ठरले होते. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही. शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. याला आमदार केले. मंत्री केले, आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा यांची गद्दारी सुरुच. ही बाप चोरणारी औलाद आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत. त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोण म्हणतोय चुन चुन के मारूंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते म्हणाले मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय कुत्री पाळायची का?

पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, जर माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल तर आम्ही कदापी शांत बसणार नाही. आज इकडे जिवंत मेळावा आहे. तिकडे नुसता रडारड सुरू आहे, ग्लिसरिनच्या बाटल्या गेल्यात. आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडले नाही. आम्ही हिंदुत्व सोडले नाही. पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तके टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलवता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?

कोंबडी चोरांवर या मेळाव्यात बोलणार नाही
कोंबडी चोरांवरती या मेळाव्यावर बोलायचे नाही, बाप चोरणा-यांवर या मेळाव्यात बोलायचे नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजचा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad