![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_bLBeuxWMCieCv5_YXo-SxBSNkZFEM5rAJahIgkUtSfrTz4BfdeOAKGDBAN7qwEiWyhIfDBgZX3P9kcHy-qLQlvabZa3gMXGAI1ymdsNfX7LzK2f2qUDbUiexuWEjEOckhrCMscao_dhFce4-07MXR-oCdbwnHKmCB4JdFoI4FBvnyY3VRbVfangxmQ/w640-h426/IMG-20230207-WA0001.jpg)
मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे मुंबईच्या तिजोरीवर डोळा ठेवून मांडलेला अर्थसंकल्प असल्याची टीका मुंबई कॉंग्रेसने केली आहे. पंतप्रधानांनी मुंबई दौऱ्यात विकास कामांचे उद्धाटन केले खरे, पण त्यांचे सर्व लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या बॅंकेतील ठेवींवर होते. त्याचाच प्रत्यय हा प्रशासकांच्या माध्यमातून मांडलेल्या मुंबई महापालिका बजेटमधून आला आहे, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. प्रकल्पांसाठी पालिकेच्या मुदत ठेवीतील १५ हजार कोटी रुपये काढले जाणार आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात पालिकेतील ठेवी रिकाम्या होतील, अशीही भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. पालिकेच्या अर्थसंकल्पावर राज्य सरकारची छाप दिसून येते, राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच हा अर्थसंकल्प मांडला असल्याची टीकाही त्यांनी केली. (Government's eye on Mumbai Municipal Corporation's FD)
कोरोनानंतर आरोग्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सर्स सामान्यांच्या आरोग्यावर जास्तीच जास्त भर देणे आवश्यक होते. मात्र मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातून आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विभागातील आर्थिक तरतुदींना कात्री लावण्यात आली आहे. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतून मुंबईभर सर्वसामान्यांसाठीच्या आरोग्यासाठी दवाखाने तयार करण्यात येत आहेत. परंतु या दवाखान्यांसाठी ५० कोटींची मोठी तरतूद केल्याची टीका त्यांनी केली. अवघ्या एका वर्षासाठी इतकी मोठी रक्कम वापरण्यात येणार आहे. मुंबईतील दीड कोटी लोकसंख्येसाठी खूपच कमी दवाखान्यांची तरतूद करण्यात आली आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असायला हवा, परंतु आताच्या दवाखान्यांची संख्या खूपच कमी आहे. शिवाय ४० टक्के डॉक्टरांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. तसेच ४५ टक्के पॅरामेडिकल स्टाफच्या जागाही रिक्त आहेत. २० टक्के नर्सेसची पदेदेखील भरलेली नाहीत. अशी स्थिती असताना दवाखान्यांची बोगस योजना चालवण्यात येत असल्याचे जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
सुशोभिकरणाच्या नावाने पैशांची उधळण -
मुंबईतील १७०० कोटी रूपयांच्या सुशोभिकरणाची कामे केली जाते आहे. मात्र ही कामे वर्षानुवर्षे मुंबईभर सुरू आहेत. परंतु या प्रकल्पांना आमदार निधी द्यायला हवा. परंतु इथे मात्र मुंबई महानगरपालिकेतील पैशाची उधळण सुरू आहे. त्यामुळे या सुशोभिकरणाच्या कामात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी लावण्यात येणाऱ्या उपकरणांचीही त्यांनी खिल्ली उडवली. मुंबईत वाहतूक कोंडीचे इतके बॉटल्सनेक्स आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या पाहता एअर प्युरीफायरचा पर्याय हा पूरक नसल्याची टीकाही त्यांनी केली.
वर्ग खोल्या खासगी क्लासेसना -
पालिका शाळांतील मुलांची गळती कमी झाली आहे. पटसंख्या वाढते असल्याने इमारतींचीही गरज भासणार आहे. असे असताना शाळांच्या इमारतींतील वर्गखोल्या खासगी क्लासेसना देण्याचा घाट घातला जातो आहे. एकीकडे एनजीओंना भाड्याने दिलेल्य़ा वर्गखोल्या काढून घेतल्या असताना आता खासगी क्लासेसना भाड्याने देण्य़ाचा विचार का केला जातो आहे, असा सवाल जगताप यांनी विचारला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणा सारख्या महत्वाच्या विषयावर कमी तरतूद करून खासगी क्लासेसना महत्व दिले जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध केला जाईल असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment