![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_H6KsGAoPi27eNqfoUOTZKiYlDcB8IwArOTGl3HS00MdktskLYklcF20a2PufKMDYGEX-diLmDpxxP75yGoYZbW_2aK-v6AQrMsc6RGJgbN0yE_FLzdhb1xQDGxJp_D3bWdRrk6O37-3hYFHVPUbtDYbKJH8P4KgCwX95XgUZU2m1SUKGbtZJ3nmP7w/w640-h320/vidhan%20bhavan.jpeg)
मुंबई - राज्यातील विशेषत: मुंबईतील हवाप्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
सदस्य मिहीर कोटेचा, सुनील राणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये मुंबईतील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवेतील गुणवत्ता कमी होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.
सध्या मुंबई आणि मुंबई परिसरात पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरु असल्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे. मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी नेमके काय करता येईल याबाबत एक बैठक तातडीने येत्या रविवारी म्हणजेच 19 मार्च रेाजी घेण्यात येणार आहे. या बैठकीला या विषयातील तज्ज्ञांबरोबरच सर्व समिती सदस्य तसेच मुंबईच्या सर्व आमदारांना बोलविण्यात येणार आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, बांधकामाच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सभोवताली बॅरिअर्स, पत्रे लावणे असे काही उपाय सुचविण्यात आले आहेत असे केसरकर म्हणाले.
राज्यातील जनतेला शुद्ध हवा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे ठाणे, चंद्रपूर येथील हवेचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच राज्यातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही केसरकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment