
नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश मानून आतापर्यंत चीन चा लौकिक होता. पण आता चीन सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश नसून या यादीत पहिल्या क्रमांकावर भारताने उडी घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ञांनी भाकीत केले होते की २०२३ मध्ये भारत सर्वाधिक जनसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येईल आणि आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (युएनएफपीए) च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करून याबाबतचा दावा केला आहे.
भारत लवकरच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येपेक्षा ३ दशलक्ष ओलांडणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालात ही बाब समोर आली आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफपीए) च्या “स्टेटस ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या या वर्षी १४२.८६ कोटी असेल, तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी असेल. ३४० दशलक्ष लोकसंख्येसह अमेरिका तिस-या क्रमांकावर असेल.
हे अंदाज फेब्रुवारी २०२३ पर्यंत उपलब्ध डेटावर आधारित आहेत. भारत आणि चीनमधून येणा-या डेटाची “अनिश्चितता” असल्यामुळे, विशेषत: भारताची शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. पुढची जनगणना २०२१ मध्ये होणार होती. पण भारतात कोरोना महामारीमुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही व ती आतापर्यंत केली गेली नाही.
भारत सर्वात तरुण लोकसंख्येचा देश -
युएनएफपीए अहवालात असे नमूद केले आहे की, भारतात ०-१४ वयोगटातील २५%, १०-१९ वयोगटातील १८%, १०-२४ वयोगटातील २६%, १५-६४ वर्षे वयोगटातील लोक ६८% आणि ६५ वरील लोक ७% आहेत.
चीनमध्ये जन्मदर कमी आणि वृद्ध अधिक -
चीनच्या आकडेवारीवर लक्ष दिल्यास, तिथे ६५ वर्षांवरील लोकांची संख्या २० कोटी झाली आहे. काही दशकांपूर्वी, चीन सरकारने १-मूल धोरण लागू केले होते, चीनच्या या धोरणामुळे सरकारला पुढील काळात विविध अडचणीला सामोरे जावे लागले होते. या वर्षाच्या सुरुवातीला चीनसाठी एक धक्कादायक बाब अशीही होती की, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले बींजिंग शहर, जे चीनची राजधानी देखील आहे, त्यात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. कोरोना महामारी हे देखील या मागील एक प्रमुख कारण मानले जात आहे.