लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2024

लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली



मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे. मला सरकारमधून मोकळे करावे, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. (Marathi News)

लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत ३० जागांवर यश मिळवले तर एनडीएला १९ जागांवरच समाधान मानावे लागले. २०१९ च्या निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवणा-या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, याची कबुली दिली. आज ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली.

महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नॅरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असे नॅरेटिव्ह तयार करण्यात आले. हे नॅरेटिव्ह आम्हाला थांबवता आले नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, सोबतच मराठा आरक्षण, शेती मालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जनतेने दिलेले जनादेश मानून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचे अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. समसमान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. काही ठिकाणी अँटीइन्कबन्सी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नॅरेटिव्ह तयार केले त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडित नेहरू यांच्यानंतर पुन्हा एकदा तिस-यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद जनतेने मोदींना दिला. एनडीएचे सरकार देशात येते. १९६२ नंतर पहिल्यांदाच तिस-यांदा सरकार होतेय. ओडिशामध्ये भाजपचे प्रथमच सरकार होतेय. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंच्या नेतृत्वात पसंती दिली, अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले. लोकसभेसोबत एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिला. त्याबद्दल जनतेचे आभार.

इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भाजप त्यांच्यापेक्षा मोठी राहिली, एनडीएचे घटकपक्ष मिळून सरकार तयार होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad