महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल

Share This


मुंबई - लाडकी बहीण योजनेवर माझं रीडिंग जे आहे ते असे आहे की, जे अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत, किंबहुना ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, ते महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करून टाकतील, असे भाकित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे.

दरम्यान, राज्यात महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अलिकडे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. अशातच लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात काही महिलांना अर्ज माघारी घेण्याबाबत ऑफलाईन पध्दतीने आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत, दरम्यान या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करणा-या महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून टीका करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कोणत्याही क्षणी महायुतीत येऊ शकतात. यात शिवसेना ठाकरे पक्षाचे ४ आमदार आणि ३ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे ५ आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी केला आहे. या दाव्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजपने महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार सुद्धा फोडायच्या विचारात आहेत, अशी बोचरी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे सुरू झाले आहे का? जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतक-यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का ? आठवा वेतन लागू करणार आहात का? असे सवालही आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. तर शिंदे गटाच्या मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे, असे कळले. मात्र त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक असल्याचेही ते म्हणाले.

महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून प्रचंड नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना पालकमंत्री नाही, मालक मंत्री त्या जिल्ह्याचे व्हायचे आहे. दरम्यान माझ्या मतदारसंघातील रस्त्यांचा आढावा घेत होतो. त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. यात बोर्ड लावलेले नाहीत त्यामुळे या अडचणी आहेत. तर या होऊ नयेत यासाठी आम्ही आढावा घेत आहोत, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages