मुंबई - परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. यावरून विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. मात्र, भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर लॉन्ग मार्च नाशिक (Nashik) येथे स्थगित करण्यात आला. मात्र, त्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भीम आर्मी आक्रमक झाली आहे.
भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी वक्तव्य केले की, सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांना मारले, त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू नका. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
अशोक कांबळे पुढे म्हणाले की, या आमदाराने आमचा लॉन्ग मार्च चिरडण्याचं काम केलं आहे, एक षड्यंत्र केलेले आहे. यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. सुरेश धस महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही.

No comments:
Post a Comment