
मुंबई - भायखळा प्राणीसंग्रहालयातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित मत्स्यालयाच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता असून सदर निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी तसेच निविदा, बोली, मंजुरी प्रक्रियेची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महानगरपालिकेतील समाजवादी पक्षाचे माजी गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित प्रकल्पातील अग्निसुरक्षा, सार्वजनिक धोके यांचा निविदेत विचार करण्यात आलेला नाही. तसेच या निविदेच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याने सदर प्रकरण गंभीर बनले आहे.
निविदेत एका बोलीदाराने भाग घेतला होता. यामुळे निवेदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल शंका आहेत. स्पर्धा रोखण्यासाठी निविदेत फेरफार करण्यात आला असावा. शिवाय, बोली लावणारी कंपनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कंपनी असल्याने सदर प्रकरण चिंताजनक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले.
प्रस्तावीत मत्स्यालय हे पेंग्विन एन्क्लोजरच्या समोर होणार आहे. येथे दररोज मोठी गर्दी होवू शकते. त्यामुळे हे ठिकाण आगीचे धोके, चेंगराचेंगरी किंवा सुरक्षिततेच्या समस्यांसाठी हॉटस्पॉट बनू शकते. याव्यतिरिक्त, मत्स्यालयासाठी राखीव ठेवलेला भाग मूळतः पेंग्विन एन्क्लोजरशी जोडलेल्या स्मृतिचिन्ह दुकानासाठी ठेवण्यात आला होता, असे स्पष्ट करत या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आवश्यकतेबद्दल आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केला.
मत्स्यालयासाठी वाटप क्षेत्रफळ फक्त ५,००० चौरस फूट असून कमाल मर्यादेची उंची २० फुटांपेक्षा कमी आहे. जागेचा अभाव, अपघाताची शक्यता, नियोजनातील अतिरेकीपणा आणि प्रक्रियेतील अनियमितता लक्षात घेता, सदर निविदा रद्द करावी आणि या प्रकरणाच्या एसीबी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पालिकेने या प्रकल्पावर ६५ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. ही रक्कम प्रकल्पाच्या प्रमाणात जास्त आहे. परिणामी हे मत्स्यालय जगातील महागड्या मत्स्यालयांपैकी एक असेल, असा इशारा आमदार शेख यांनी केला आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुमजली मत्स्यालय विकसित करण्याची राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मत्स्यालय दक्षिण मुंबईत ५ किलोमीटरच्या परिघात दुसरे मत्स्यालय होणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प अनावश्यक असल्याचा आरोपही आमदार रईस शेख यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment