
नवी दिल्ली - रस्ते अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी केंद्र सरकारने कॅशलेस उपचार योजना आणली आहे. देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयाने सोमवारी जारी केली. त्यामुळे देशभरात अपघातातील जखमींना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी २०२५ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, मान्यताप्राप्त कोणत्याही रुग्णालयात जखमींना दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघात झालेल्या दिवसापासून सात दिवसांच्या उपचाराचे पैसे मिळणार आहेत. ही योजना सोमवारपासून म्हणजे ५ मे २०२५ पासूनच लागू करण्यात आली आहे. कॅशलेस उपचार योजनेचा लाभ घेण्याचे तीन टप्पे आहेत.
पहिला म्हणजे अपघातानंतर जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जारी करेल. दुसरा म्हणजे अपघातानंतर २४ तासांत पोलिसांना अपघाताची संपूर्ण माहिती, जखमीच्या प्रकृतीबाबतची सद्य: माहिती कळवावी लागेल. तिसरा म्हणजे जखमींची फाइल तयार होईल. त्यात पोलीस रिपोर्ट, जखमीचे ओळखपत्र जमा करावे लागेल. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील.
अपघातातील जखमींना प्रवेशावेळी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. प्राथमिक उपचार मोफत मिळतील. गंभीररीत्या जखमी झाल्यास शस्त्रक्रियेची सुविधा मिळेल. त्याचबरोबर एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या सुविधा मोफत मिळतील. उपचारावेळी दिली जाणारी औषधे मोफत असतील.
No comments:
Post a Comment