
मुंबई - पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक यांना उरी सेक्टरमध्ये, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई येथील मुरली नाईक हे दिनांक 9 मे रोजी पहाटे एलओसी (LOC) येथे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत. त्यांचे वय केवळ 23 वर्ष होते. मुंबई येथील घाटकोपर येथे त्यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावले आहे. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपला मुलगा शहीद झाल्याचे समजताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. मुरली नाईक यांचे वडिल घाटकोपर भागात मजुरीचे काम करतात.
पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे ते 2022 मध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
No comments:
Post a Comment