मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित 'आता थांबायचं नाय' हा प्रेरक असा चित्रपट बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कर्मचाऱ्यांसोबत पाहिला. तर, हा चित्रपट पाहिल्यानंतर मी निःशब्द झालो आहे, अशी भावना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली.
'आता थांबायचं नाय' हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रपट आज (दिनांक १ मे २०२५) प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल (दिनांक ३० एप्रिल २०२५) सायंकाळी मुंबई महानगरपालिका मुख्यालयालगत स्थित मेट्रो चित्रपटगृहात 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, अभिनेते आशुतोष गोवारीकर, चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतील सुमारे एक हजारांहून अधिक कर्मचार्यांनी आज (दिनांक १ मे २०२५) प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहिला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या चित्रपटगृहांत हा चित्रपट चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई महानगर स्वच्छ–सुंदर ठेवण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर उतरून स्वच्छता करीत असतात. तर पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रात्रंदिवस झटणारे जलअभियंता विभागाचे कर्मचारी असो वा नदी–नाले स्वच्छता करणारे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी असो, आपले कर्तव्य बजावत असतानाच उराशी छोटी-मोठी स्वप्ने घेऊन ती सत्यात उतरवण्यासाठी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. अशारीतीने जगणाऱ्या मुंबईच्या या नायकांची स्वप्नं अचानक एक दिवस त्यांच्याकडे चालून येतात आणि या कर्मचाऱ्यांचे आयुष्यच बदलून जाते. हे सर्व घडते प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पुढाकाराने. सत्य घटनेवर आधारित असलेला कामगारांचा हा प्रेरणादायी प्रवास 'आता थांबायचं नाय' चित्रपटाद्वारे जनतेसमोर सादर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांची धडपड, संघर्ष पाहून चित्रपटगृहातील प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा पुरविते. या सेवा-सुविधा पुरवत असताना वाढती लोकसंख्या व त्यातून निर्माण होणारी विविध आव्हाने यांचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटाद्वारे करण्यात आले आहे. तसेच शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात बदल घडू शकतो, या सकारात्मक भावनेतून अनेक अडचणींवर मात करत रात्रशाळेत प्रवेश घेऊन हे कर्मचारी दहावीचे शिक्षण पूर्ण करून समाजासमोर आदर्श घालून देतात, त्याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
एकूणच, 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट संघर्ष, जिद्द व आत्मसन्मान यांचे प्रेरणादायी दर्शन घडवतो. जीवनात किती जरी अडचणी आल्या तरी त्या प्रत्येक अडचणींवर मात करून अधिक मेहनत घेऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या स्वप्नांना एका अधिकाऱ्याच्या पुढाकाराने बळ मिळते आणि एका शिक्षकाच्या मार्गदर्शनातून त्या स्वप्नांना पंख फुटतात. शिक्षकाचं काम ज्याला कळतं तो शिक्षक, श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा, यासह अनेक संवादांतून अंतर्मुख करायला लावणारा हा चित्रपट आहे.
झी स्टुडिओजसोबत 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले आहे. अभिनेते आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे या सर्वांच्या भारदस्त अभिनयातून चित्रपटाची कथा फुलली आहे.
हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment