
मुंबई - आपला मुलगा, मुलगी शाळेत पोहचला की नाही, शाळेला सुट्टी करून इतर ठिकाणी फिरायला गेला नाही ना असे अनेक प्रश्न पालकांना पडले असतात. मात्र आता शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवे आदेश जारी केले असून, अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवला जाणार आहे. सीसीटीव्ही, समुपदेशन, तीन वेळा हजेरी, व शिक्षकांचे चारित्र्यप्रमाणपत्र बंधनकारक करून शाळांची सुरक्षा अधिक बळकट करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हा परिषद तसेच खासगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी दिवसातून तीन वेळा हजेरी घेणे, गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने एसएमएसद्वारे माहिती देणे, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करणे यासारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजनांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. शाळांमधील अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी दिवसातून तीन वेळा हजेरी घेणे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हजेरी घेतली जाणार असून, जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल, तर त्याच्या पालकांना तातडीने एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. या उपाययोजनेचा उद्देश पालकांना आपल्या मुलांच्या शाळेतील उपस्थितीची माहिती त्वरित मिळावी आणि कोणत्याही अनुचित घटनेची शक्यता कमी करणे हा आहे. यंदापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक...
शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात, वर्गांच्या दरवाज्यांजवळ, प्रवेशद्वार, मैदाने आणि स्वच्छतागृहांच्या बाहेरील भागात हे कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालता येईल. शाळांना किमान एक महिन्याचा सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे आवश्यकता भासल्यास फुटेज तपासून कारवाई करता येईल.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ...
शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वी पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना शाळेत प्रवेश मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास, त्याची सेवा तत्काळ समाप्त केली जाईल. या नियमामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांवर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढेल. याशिवाय, शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment