
मुंबई - भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० ते दि. २८ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ४.२ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांसह पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ -
राज्यात पुढील २४ तासासाठी पालघर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका व सावित्री नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ९८ टक्के भरले असून कोळवण नदी पात्रत ५०० ते १००० क्युसेक विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात पवना धरणातून ७४१० क्यूसेक विसर्ग, खडकवासला धरणातून १७४४ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवला जाऊ शकतो. याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गवर खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर दरड कोसळली होती दरड हटविण्यात आली वाहतूक सुरळीत चालू आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असता निजामाबाद जगदलपूर रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली होती. सदर मार्ग वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. सध्या सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत चालू आहे.
राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस व संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

No comments:
Post a Comment