
मुंबई - मुंबई, ठाण्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र आज दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे हंडी बांधताना उंच मनोऱ्यावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू झाला. तर, घाटकोपरमध्येही एका १४ वर्षीय तरुणाचा टेम्पोमधून पडून मृत्यू झाला. मुंबईत २१० गोविंदा जखमी झाले.
तरुण गोविंदाचा मृत्यू -
गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) याचा मृत्यू झाला. मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे दुपारी तीनच्या सुमारास बाल गोविंदा पथकाच्यावतीने हंडी बांधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यादरम्यान जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) हा तरुण पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्याला उपस्थितांनी नजीकच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यास नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बाल गोविंदाचा मृत्यू -
गावदेवी गोविंदा पथक हे अंधेरी पूर्व येथून आदर्श नगर परिसरातून जात असताना रोहन मोहन माळवी (१४) हा टेम्पोतून खाली पडताच बेशुद्ध झाला. कावीळ झाली असल्याने तो थर रचण्यात सहभागी झाला नव्हता, पण गोविंदा पथकासोबत होता. त्याला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
२१० गोविंदा जखमी -
दहीहंडीच्या थरारात मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या असून आतापर्यंत मुंबईत २१० गोविंदा जखमी झाले. त्यापैकी १४२ गोविंदांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तर ६८ गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
न्यायालयाच्या आदेशांनंतरही १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग -
उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवात १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाला नकार दिला आहे. तरीही अनेक गोविंदा पथकांनी न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवत १४ वर्षीय मुलांना गोविंदा पथकात सामावून घेतले. तसेच, या मुलांना सर्वात वरच्या थरावर चढवून त्यांच्याकडून दहीहंडी फोडण्यात आली.

No comments:
Post a Comment