
विरार - विरारमधील दुर्दैवी रमाबाई आपर्टमेंट दुर्घटनेला तब्बल ५० दिवस उलटल्यानंतर अखेर मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदतीचा दिलासा मिळू लागला आहे. २६ ऑगस्ट रोजी घडलेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. (5 lakh cheque distributed to the heirs of those killed in Virar building accident after 50 days)
या भीषण अपघातानंतर शासनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र प्रशासकीय प्रक्रिया आणि पडताळणीमुळे ही मदत विलंबाने मिळत होती. अखेर ५० दिवसांनंतर आजपासून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण सुरू झाले आहे.
या मदतीचे धनादेश स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत पीडित कुटुंबांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला वैयक्तिकरित्या संपर्क साधून धनादेश दिले जात आहेत.
२६ ऑगस्ट रोजी विरार (पूर्व) येथील रमाबाई आपर्टमेंट ही सात मजली इमारत कोसळल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घटनेनंतर महापालिका आणि बचाव पथकांनी रात्रंदिवस प्रयत्न करून ढिगाऱ्यातून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले होते.
आता मिळालेली आर्थिक मदत जरी त्या वेदनेची भरपाई करू शकत नसली, तरी शासनाने उचललेले हे पाऊल पीडित कुटुंबांना दिलासा देणारे ठरत आहे. स्थानिकांनी मात्र या प्रकरणात जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

No comments:
Post a Comment