
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) यंदाच्या दिवाळी बोनसची घोषणा केली असली, तरी आरोग्य क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सना पुन्हा एकदा या यादीतून वगळण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू) यांनी याविरोधात आज कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. (Asha workers celebrate Diwali in darkness)
युनियनच्या जिल्हा सरचिटणीस आरमायटी इराणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीएमसी आयुक्तांनी शिक्षक, बालवाडी शिक्षिका, मदतनीस, CHV या सर्वांना बोनस जाहीर केला, परंतु आशांचे नाव मात्र पुन्हा एकदा वगळले गेले. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई- विरार आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी त्यांच्या विभागातील आशांना भाऊबीज दिली आहे, मग श्रीमंत बृहन्मुंबई महापालिका का देत नाही?” असा सवाल युनियनने उपस्थित केला आहे.
आशा वर्कर्स शहरातील वस्त्यांमध्ये दररोज घरोघर जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा पुरवतात. लसीकरण, मातृ आणि बाल आरोग्य तपासण्या, तसेच साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी ते दिवस-रात्र कार्यरत असतात. तरीही त्यांच्या मेहनतीचा सन्मान न करता बीएमसीकडून कायम उपेक्षा होत असल्याची खंत युनियनने व्यक्त केली.
“आशा वर्कर्सच्या श्रमाला योग्य मान्यता न देता, त्यांना सणासुदीच्या काळातही अन्यायाचा सामना करावा लागत आहे. बीएमसीने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा आणि सर्व आशांना भाऊबीज जाहीर करावी,” अशी मागणी युनियनने केली आहे.

No comments:
Post a Comment