
मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जलवाहिन्यांवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे मुंबईतील एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर या विभागांतील काही भागांमध्ये १४ नोव्हेंबर (शुक्रवार) सकाळी १० वाजेपासून १५ नोव्हेंबर (शनिवार) सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल २२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या १२०० मिमी व्यासाच्या जुनी आणि नवीन तानसा जलवाहिनी तसेच ८०० मिमी व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा (चार बटरफ्लाय आणि एक स्लुईस झडप) बदलण्याचे महत्त्वाचे काम या काळात हाती घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचे आवाहन -
“पाणीपुरवठा बंद असलेल्या काळात नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल,” असे आवाहन बीएमसी प्रशासनाने केले आहे.
प्रभावित विभाग आणि परिसर -
एन विभाग
(१५ नोव्हेंबर पहाटे ३.४५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत)
राजावाडी पूर्वेकडील परिसर, चित्तरंजन नगर, विद्याविहार, राजावाडी रुग्णालय, ओएनजीसी वसाहत, रेल्वे वसाहत, आर. एन. गांधी मार्ग इ.
एल विभाग
(१४ नोव्हेंबर सकाळी १० ते १५ नोव्हेंबर सकाळी ८ पर्यंत)
न्यू टिळक नगर, एलटीटी, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, जागृती नगर, कसाई वाडा, चुनाभट्टी, कुरेशी नगर, व्ही. एन. पुरव मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर इ.
एम पश्चिम विभाग
(१४ नोव्हेंबर सकाळी १० ते १५ नोव्हेंबर सकाळी ८ पर्यंत)
टिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, शास्त्री नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, गोदरेज वसाहत, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत इ.
एफ उत्तर विभाग
(१५ नोव्हेंबर पहाटे ३.४५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत)
शीव (सायन) पश्चिम-पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, प्रतीक्षा नगर, शीव कोळीवाडा, सरदार नगर, वडाळा टीटी, गांधी नगर, कोरबा मिठागर, भीमवाडी इ.

No comments:
Post a Comment