
मुंबई - अखेर ३६ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अमर महल परिसरातील भूमिगत बोगदा क्रमांक १ आणि २ ला जोडलेल्या २५०० मिमी व्यासाच्या महत्त्वपूर्ण जलवाहिनीच्या छेद-जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने अखंड प्रयत्नांनंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, शहरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला आहे.
या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक कामासाठी शंभरहून अधिक अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि कामगारांनी दिवस-रात्र युद्धपातळीवर काम केले. निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी महापालिकेच्या जल अभियंता खात्यासह विभाग पातळीवरील सर्व चमूंनी समन्वय साधत सतत ३६ तास काम सुरू ठेवले.
कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस आणि एन विभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्रारंभ झाला आहे.
महत्त्वाच्या जलवाहिनीवरील हे काम वेळेत पूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला पाणीपुरवठा आता पूर्वपदावर येत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे.

No comments:
Post a Comment