मुंबई - काही दिवसांनंतर गणेशोत्सव आलं असताना मुंबईतील १४६३ गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत ५२७ मंडळांनाच मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. येत्या तीन दिवसांत उर्वरित मंडळांना परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गुरुवारी गणेशोत्सव मंडळांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली..
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी मंडपांच्या परवानग्या वेळेत मिळत नाहीत. परवानगीची समस्या यंदाही कायम राहिली आहे. गणशोत्सव जवळ आला असतानाही निम्म्याहून अधिक मंडळांना अजूनही परवानग्या मिळालेल्या नाहीत. १४६३ मंडळांपैकी ११३२ मंडळांचे अर्ज आले असून आतापर्यंत त्यातील ५२७ मंडळांना मंडपाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. या परवानग्यांसाठी गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी विविध ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. यंदा या परवानग्यांची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने मंडळांना परवानग्यांसाठी विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून एकाच ठिकाणी मिळणार आहे. मात्र, पालिकेच्या क्लिष्ट धोरणामुळे परवानग्या रखडल्याचे चित्र आहे. याबाबत गुरुवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पालिका कार्यालयात बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या तीन दिवसांत उर्वरित परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही महाडेश्वर यांनी सांगितले.