कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाला शिक्षणाची द्वारे खुली करून देण्यासाठी आयुष्य वेचले.पिढ्यान्पिढ्या ज्यांना शिक्षणाची संधी नव्हती त्यांना ती मिळवून दिली. त्यामुळेच शिक्षणासाठी प्रत्येकाला समाजाने मदत करणे हीच कर्मवीरांना खरी आदरांजली ठरेल. ' असे उद्गार रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक मंडळाचे सदस्य डॉ. एन. डी. पाटील यांनी काढले.
कुलाब्यातील उषादेवी वाघे या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील यांनी कर्मवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. ' मुलं उपजतच बुद्धिमान असतात. त्यांना समाजाने संधी दिली तर ती चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात. त्यादृष्टीने समाजाने त्यांना संधी देणे गरजेचे आहे. ' असेही पाटील यांनी नमूद केले. कर्मवीरांची ' कमवा आणि शिका ' ही संकल्पना आजही आदर्श असल्याचे ते म्हणाले. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.


No comments:
Post a Comment