मुंबई- राज्यातील दहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सोमवारी केली. डहाणू, जव्हार, इगतपुरी, त्र्यंबक, नंदुरबार, तळोदा, नवापूर, किनवट, चिखलदरा आणि पांढरकवडा या पालिकांसाठी मतदान होत असून, सोमवारी मध्यरात्रीपासूनच या शहरात आचारसंहिता लागू झाली आहे.
4 ते 10 ऑक्टोबर या कालावधित सुट्या वगळून नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. 11 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
27 ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढवणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 4 नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यावर सायंकाळी 6.30 नंतर किंवा दुस-या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील.
निकाल जाहीर झाल्यानंतर पालिका हद्दीत लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सत्यनारायण यांनी सांगितले.
नगरपरिषदनिहाय जागांचा तपशील (कंसात महिला राखीव) : इगतपुरी- 19 (10), त्र्यंबक- 17 (9), किनवट- 17 (9), नंदुरबार- 37 (19), तळोदा- 17 (9), नवापूर- 18 (9), डहाणू- 23 (12) जव्हार-17 (9), चिखलदरा- 17 (9) आणि पांढरकवडा- 17 (9).


No comments:
Post a Comment