मुंबई - शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचा चौथरा हटवून त्याची दुसर्या जागी पुनर्स्थापना करताना मंगळवारी पहाटे अपुर्या शिवसैनिकांमुळे पक्षाला हार पत्करावी लागली. त्यामुळे पराभवाने खचलेल्या काही कडवट शिवसैनिकांनी ‘कुठे गेले सेनेचे शेंदाडशिपाई’ असा उद्विग्न सवाल जाहीरपणे उपस्थित केला.
बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पक्षाचे 72 नगरसेवक आहेत, परंतु सोमवारी चौथर्याचे स्थलांतर करण्याबाबत कॉल देऊनही जेमतेम दोनच नगरसेवक उपस्थित राहिले. ‘ नगरसेवकांनी शिवाजी पार्ककडे पाठ फिरवल्याने पोलिसांची दादागिरी सहन करणे भाग पडले,’ असे जोगेश्वरीचा शिवसैनिक म्हणाला. ‘बाळासाहेबांमुळे ज्यांना पद मिळाले, त्यांनीच आपल्या बापाचे पांग फेडण्याची संधी दवडली,’ अशी तिखट प्रतिक्रिया भायखळ्याच्या वयोवृद्ध शिवसैनिकाने व्यक्त केली. ‘पक्षाचे आमदार नागपूरला गेलेत, त्यामुळे अशा काळात समाधीचे प्रकरण हाताळायला नको होते,’ असे दादरच्या कार्यकर्त्याने सांगितले. ‘आपल्या नेत्यांनी नांगी टाकल्याने हसे झाले,’ अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होती.
महापौर पळाले : चौथरा हटवण्यातील विलंबाबद्दल महापौर सुनील प्रभू यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे 4 डिसेंबरपासून महापौर अपात्रतेची टांगती तलवार घेऊनच दिवस कंठत होते. चौथरा उद्ध्वस्त करताना ते मैदानावर उपस्थित होते; परंतु दुसरीकडे नवी समाधी उभारण्यावेळी मात्र अतिक्रमणाच्या बालंटामुळे महापौर शासकीय बंगल्यातच बसून राहिले.


No comments:
Post a Comment