नक्षलवाद्यांचा विश्‍वास संपादन करून चर्चा करावी - जांबुवंतराव धोटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नक्षलवाद्यांचा विश्‍वास संपादन करून चर्चा करावी - जांबुवंतराव धोटे

Share This
मुंबई : ऑपरेशन ग्रीन हंटच्या नावाने नक्षलवाद्यांना जीवे मारण्यापेक्षा त्यांचा विश्‍वास संपादन करून चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, अशी भूमिका बस्तरच्या हल्ल्याविषयी बोलताना माजी आमदार जांबुवंतराव धोटे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

बस्तर, छत्तीसगडच्या घटनेने सारा देश हादरला. यामुळे सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष बदल्याच्या भावनेने पेटून उठले आहेत. मात्र खून का बदला खून हा रानटी विचार आहे. गोळय़ांनी प्रश्न सुटत नाही. महात्मा गांधी, विनोबाजी आज असते तर ही भाषा त्यांना मान्य झाली असती का? असा सवाल करीत धोटे यांनी शासनाचा विरोध असताना महात्मा गांधी नवसारीत शिरले आणि विनोबाजी डाकूंच्या हृदयपरिवर्तनासाठी चंबळच्या घाटीत गेले, याची आठवण त्यांनी करून दिली.

ही माणसे नक्षलवादी का झाली, त्यांनी बंदुका खांद्यावर का घेतल्या, याचे संशोधन आम्ही करणार की नाही, आम्ही अंतर्मुख होणार की नाही, असे सवाल करीत धोटे यांनी आजची सामाजिक आणि राजकीय अवस्था याला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची मिलिभगत याला कारणीभूत आहे. आजही या देशातील दुर्गम भागात कोणत्याही कल्याणकारी, विकासात्मक योजना पोहोचलेल्या नाहीत. या दुर्गम भागात शिक्षणाची व्यवस्था नाही, असेही धोटे यांनी सांगितले.

नक्षल हा एक विचार आहे आणि तो आंतरराष्ट्रीय विचार आहे. तो विचार कार्ल मार्क्‍सचा आहे. मार्क्‍स, लेनिनच्या नावाने तो मांडला जात आहे. उद्या जर नक्षलवाद्यांवर फौजा पाठविल्या आणि तिकडे मार्क्‍सवादी विचारांच्या चीनने आणि रशिया व इतर कम्युनिस्ट देशांनी जर बंदुका उचलल्या तर याचा विचार करण्याची गरज असल्याचे धोटे यांनी सांगितले. सध्याची लोकशाही ही मांडवली लोकशाही असून राज्यसभा तर भांडवलदारांचा अड्डा असल्याची टीका धोटे यांनी या वेळी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages