आठवलेंनी आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणावे - नवाब मलिक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवलेंनी आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणावे - नवाब मलिक

Share This

मुंबई : ठाकरे कुटुंबात सुरू असलेल्या वादात लक्ष घालण्याऐवजी आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रयत्न करावेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. आंबेडकरी जनता कधीही युतीला मतदान करू शकत नाही, हे वास्तव मान्य करून आठवले यांनी महायुतीत जाण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीत मनसेलाही सामावून घ्यावे, अशी भूमिका रिपाइं नेते रामदास आठवले यांनी घेतली होती. यावरून शिवसेनेने त्यांना जाहीरपणे फटकारत मनसेला बरोबर घेण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आठवले यांच्या उठाठेवीची चांगलीच खिल्ली उडवली. प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी ठाकरे कुटुंबातील महाभारतात आठवलेंनी लक्ष घालू नये, असा मित्रत्वाचा सल्ला दिला. कौरवांनी पांडवांना पाच गावे न दिल्याने महाभारत घडले. ठाकरे कुटुंबीयांतही सध्या तसेच महाभारत सुरू आहे. त्यात लक्ष घालण्याऐवजी रिपाइंच्या विविध गटांत विखुरलेल्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आठवले यांनी प्रयत्न केले तर आंबेडकरी जनता त्यांना धन्यवाद देईल. आंबेडकरी विचारांचा जातीयवादी शक्तींशी समझोता होऊच शकत नाही, हे लक्षात घेऊन आठवले यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages