महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प - मुख्यमंत्री

Share This

मुंबई : महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणे, मागास भागात उद्योग उभारणी, कोरडवाहू भागात शाश्‍वत शेती, अन्नधान्यात स्वयंपूर्णता, रोजगार निर्मितीत वाढ, सुसह्यनागरी जीवन, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ या बाबी राज्याच्या अजेंड्यावर असून त्यावर लक्ष केंद्रित करून राज्याला पुढील वाटचाल करायची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.

येथील हॉटेल आयटीसी येथे 'अजेंडा महाराष्ट्र' या विषयावर औद्योगिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, वने मंत्री पतंगराव कदम, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योजक वेणुगोपाल धूत यांच्यासह अनेक नामवंत उद्योजक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वार्तालापात उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र या यशोगाथा देशभर पोहोचल्या पाहिजेत. या संदर्भात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून महाराष्ट्राच्या इमेज बिल्डिंगमध्ये त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

दरडोई उत्पन्नात राज्याचा दुसरा क्रमांक असून राज्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मनुष्यबळ आणि गुणवत्ताही राज्यात अफाट आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण झाले असले तरी अनेक आव्हाने समोर आहेत. राज्याच्या सकल उत्पन्नात उद्योग व सेवा क्षेत्राचा वाटा ८९ टक्के असून शेती क्षेत्राचा वाटा १0 टक्के आहे. तथापि सिंचनाखाली क्षेत्र वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. नवीन वस्त्रोद्योग धोरण व त्यातील महत्त्वपूर्ण बाबी या वेळी मुख्यमंत्र्यांनी विशद केल्या.

नवीन औद्योगिक धोरणात उद्योजकांना बिझनेस फ्रेंडली वातावरण निर्माण व्हावे, पाणी, जमीन व वीज यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, सिंगल विंडो सिस्टीमद्वारे उद्योजकांना विविध परवाने सुलभपणे प्राप्त व्हावेत, असा प्रयत्न करण्यात आला आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. चीनच्या पंतप्रधानांनी राज्यास नुकत्याच दिलेल्या भेटीनंतर भारत व चीन यांच्यामध्ये औद्योगिक संबंध दृढ होतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages