पवईतील डॉ. आंबेडकर उद्यानाची दुरवस्था - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पवईतील डॉ. आंबेडकर उद्यानाची दुरवस्था

Share This
थीम पार्क उभारण्यास निघालेल्या शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेला मागील सात वर्षापासून पवईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करता आलेला नाही. तब्बल ४० कोटी रुपये खर्च करूनही या उद्यानाचे काम ७ वर्षापासून अर्धवटच स्थितीत आहे.
मुंबईतील पवई तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेचा विकास तथा सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने वर्ष २००६ मध्ये कंत्राट दिले होते. तब्बल १२ एकर जागेतील या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा कंत्राट कालावधी संपूनही पुन्हा त्याच कंत्राटदाराला १५ ऑगस्ट २०१२ पर्यंत मुदतवाढ दिली.
सोबतच कंत्राट किमतीतही वाढ करून देण्यात आली. मात्र विकासाच्या नावावर या उद्यानाची दुरवस्थाच झाली आहे. त्यामुळे पवई तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी या उद्यानात येणा-या पर्यटकांना या दुरवस्था झालेल्या उद्यानाचे दर्शन घ्यावे लागत आहे.
पवईतील या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम मागील ७ वर्षापासून सुरूच आहे. यापूर्वीच्या कंत्राटदारांने उद्यानाचे लोखंडी ग्रील व दरवाजे विकून काढता पाय घेतला होता. त्यानंतर नव्याने आलेल्या कंत्राटदाराला काम देऊनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कची स्वप्ने रंगवत आहेत. पवईतील उद्यानाच्या दुरवस्थेचे काय, असा प्रश्न मनसेचे स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केला आहे. पवईतील अन्य उद्यानांचीही स्थितीही वाईट आहे. या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी गदुल्ले व ओल्या पाटर्य़ा करणा-यांचे अड्डे झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages