दलित, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी बसपालाच साथ द्या! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी बसपालाच साथ द्या!

Share This
मुंबई : गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसने दलित व तळागाळातील लोकांसाठी काहीच केले नाही. सहा वर्षे सत्तेत राहून भारतीय जनता पार्टीही काही करू शकली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना बाजूला सारा आणि गरीब, दलित व तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी बसपाला विजयी करा, असे आवाहन बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी केले.
चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानात आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस आणि भाजपा यांच्या कारकीर्दीत सर्वसामान्य उपेक्षितच राहिले. काँग्रेसकडे तर कित्येक वर्षे सत्ता राहिली. दलित समाजाच्या अधोगतीला काँग्रेसच जास्त जबाबदार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात रोज नवनवीन समाजाला सामावून घेत सरकार खर्‍या मागासलेल्या वर्गांना आरक्षणापासून वंचित ठेवत आहे. रोज नवनवीन नियम बनवून या समाजाला कसा लाभ होणार नाही, हे पाहिले जात आहे. उच्च वर्गातील काही समाजालाही आरक्षणाची गरज आहे. केंद्र सरकारला आपण वारंवार विनंती करून शिक्षण तसेच सरकारी नोकरीत उच्च वर्गातील लोकांसाठी काही आरक्षण ठेवावे म्हणून प्रयत्न केले. पण त्यांनी दाद दिली नाही. राहुल गांधी हेच काँग्रेसचे अघोषित पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. ते आले तरी सर्वसामान्यांच्या जीवनात काडीचाही बदल होणार नाही, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस तसेच भाजपा सरकारने काही ठरावीक भांडवलदारी उद्योगपतींसाठीच धोरणे बनवली. त्यामुळे देशात गरिबी आणि बेकारी कायम राहिली. भ्रष्टाचार बोकाळला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही कायदे करण्यात आले, पण त्यांचा र्मयादितच वापर झाला. महाराष्ट्रात अनेक महापुरुष झाले, पण त्यांना येथे सन्मान मिळाला नाही. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होतो तेव्हा याच महापुरुषांना आम्ही तेथे सन्मानित केले. मुंबईत उत्तर भारतीय तसेच बिहारी लोकांचे हाल जनावरांपेक्षा वाईट आहेत. त्यांना दुय्यम, सापत्नभावाची वागणूक दिली जाते. आपले सरकार सत्तेत आल्यास सर्वांना समान वागणूक मिळेल. मुंबईतील सर्व झोपडीधारकांना पक्की घरे दिली जातील, असे आश्‍वासनही मायावतींनी दिले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी जनतेला फार सुंदर स्वप्ने दाखवत आहेत. जनतेने त्यांच्या बहकाव्यात येऊ नये. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड झाले. ते देशाचे पंतप्रधान झाले तर देशभर दंगे होतील. देश बरबाद होईल, असेही त्या म्हणाल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages