मुंबई / अजेयकुमार जाधव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले व आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार असलेले वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतीगृह सात दिवसांच्या आत रिकामे करण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेने दिले आहेत. वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्याचे सांगत पालिकेने हा निर्णय घेतला आहे. वसतीगृह धोकादायक स्थितीत असून, ते तात्काळ रिकामे करण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. वसतीगृह रिकामे करण्यासाठी महापालिकेने सात दिसवसांची मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांची राहाण्याची पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने हा निर्णय घेतला असल्यास आम्ही आंदोलन करुन त्याला विरोध करु असा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. सध्या परीक्षा सुरु असल्याने आता जाणार कुठे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असून पालिके विरोधात विद्यार्थी आणि आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सिद्धार्थ वसतीगृहाची इमारत धोकादायक असून, या इमारतीला पालिकेने याआधीही नोटीस बजावली आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप ही इमारत रिकामी करण्यात आलेली नाही. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिली. या वसतीगृहाची मालकी असणा-या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे ही इमारत पाडण्यासाठी पैसे नसतील तर पालिका आपल्या खर्चाने ही इमारत पाडेल आणि नंतर हा खर्च पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडून वसूल करेल, असेही आयुक्त म्हणाले. कुंटे यांनी आज स्वत: वसतीगृहाची पहाणी केली.
दरम्यान १९६४ ला सुरु झालेले वसतिगृह १९८५ पर्यंत सुरु होते. १९८५ नंतर हे वसतीगृह अचानक बंद करण्यात आले. तरीही या वस्तीगृहामधून दर वर्षी १५० विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडत आहे. विद्यार्थी, बौद्ध भन्ते तसेच राजकीय कार्यकर्ते यांना राहण्यासाठी बनवलेले वसतिगृह आता तोडणार असल्याने या सर्वांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिपल्स वर ताबा कोणाचा यावरून रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांचा वाद सुरु असताना कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

