मुंबई / अजेयकुमार जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले सिद्धार्थ विहार वसतिगृह खाली करण्याबाबत पालिकेने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला नोटीस बजावली होती. पीपल्सच्या ट्रस्टीनी जागा खाली करण्यास नकार दिल्याने पालिकेने ट्रस्टी विरोधात दादरच्या शिंदेवाडी कोर्टामध्ये फौजदारी दावा दाखल केला होता. कोर्टाने मंगळवारी ( २९ एप्रिल) सर्व ट्रस्टीना निर्दोष सोडल्याने पालिकेला मोठी चपराक बसली आहे असे पीपल्सचे वकील अनिल कांबळे यांनी सांगितले आहे.
पीपल्स सोसायटीचे वडाळा येथे सिद्धार्थ वसतिगृह आहे. हे वसतिगृह २०११ मध्ये धोकादायक असल्याचे कारण देत खाली करण्यासाठी पालिकेने सोसायटीला नोटीस बजावली होती. या नोटीसीद्वारे पीपल्सच्या ट्रस्टीनी वसतिगृह खाली करण्यास नकार दिल्याने पालिकेने एम.एस.मोरे, पी.एस.गायकवाड, डी.जे.गांगुर्डे,बालकृष्णन यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता. परंतू पालिका ट्रस्टी विरोधात हा गुन्हा सिद्ध करू शकली नसल्याने न्यायालयाने सर्व ट्रस्टीना निर्दोष सोडले आहे. ट्रस्टीना निर्दोष सोडल्याने वसतीगृहामधील विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
पालिकेने पुन्हा २३ एप्रिलला सिद्धार्थ वसतीगृह खाली करण्याची नोटीस बजावली असल्याने वसतिगृह खाली करण्यास पालिकेला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पीपल्सचे वसतिगृह खाली करण्याप्रकरणी पालिका केस हरली असल्याने ट्रस्टीनी पुन्हा आलेल्या नोटीसीला उत्तर देवून वसतिगृह वाचवावे व या ठिकाणी पुन्हा नवीन वसतिगृह बांधावे अशी मागणी केली जात आहे.

