गृह विभागाकडे दुसर्‍या सायबर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृह विभागाकडे दुसर्‍या सायबर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
शहरातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच असल्यामुळे मुंबई पोलिसांनी आता आणखी एक सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठी पाऊल टाकले आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज अधोरेखित करून मुंबई पोलिसांनी यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
सद्यस्थितीत मुंबई पोलीस दलात सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी केवळ एक सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) या पोलीस ठाण्याची सहा वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात सायबर गुन्ह्यांत चिंतनीय वाढ झाली, मात्र गृह विभागाने सायबर पोलीस ठाण्याची संख्या एकच ठेवली आहे. मुंबई पोलीस मुख्यालयात सायबर गुन्हे तपास पथक आहे; पण हे पथक केवळ गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करते. सध्या कार्यान्वित असलेल्या एकमेव सायबर पोलीस ठाण्यावर शेकडो गुन्ह्यांचा तपास करण्याचा भार आहे. तसेच शहर परिसरात राहणार्‍या रहिवाशांना सायबर गुन्ह्यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी पश्‍चिम उपनगरात जावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी दुसरे सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याची गरज आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार, दुसर्‍या सायबर पोलीस ठाण्याचे बांधकाम पहिल्या पोलीस ठाण्याप्रमाणेच केले जाणार आहे. प्रस्तावित पोलीस ठाणे शहर परिसरातील रहिवाशांना सोयीस्कर ठरेल, यादृष्टीने मध्यवर्ती भागात स्थापन केले जाणार आहे. येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चार-पाच पोलीस निरीक्षक आणि १५ ते २0 कनिष्ठ अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यांत दरदिवशी सरासरी तीन ते चार तक्रारी नोंद होतात. सायबर पोलीस ठाण्यांच्या अपुर्‍या संख्येमुळे अशा गुन्हेगारीच्या यशस्वी तपासाचा दर १0 टक्केही नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages