मुंबई : पश्चिम उपनगरातील रस्ते दुरुस्ती, नालेसफाई व झोपडपट्टय़ा स्वच्छता कामांचा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी आढावा घेतला. झोपडपट्टय़ांमध्ये वस्ती विकास योजनेंतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एकूण ७४0 संस्था आपापल्या वस्त्यांच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत.
वस्ती योजनेंतर्गत नागरिकांच्या अडचणी, त्यांना भेडसावणारे प्रश्न यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा पाहणी दौरा आयोजित केला आहे. सध्या ७४0 संस्था स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानातर्फे चांगल्याप्रकारे कार्यरत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुंबई शहरातील ५0 टक्क्यांहूनही जास्त नागरिक झोपडपट्टय़ांमध्ये राहत असून सर्वच झोपडपट्टीवासीयांनी या अभियानांतर्गत सहभागी व्हावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनी पश्चिम उपनगरांतील रस्ते दुरुस्ती व रुंदीकरण, पेव्हर ब्लॉक्सची कामे, छोट्या नाल्यांची साफसफाई ही कामे पाहिली. ब्रिमस्टोव्हेड प्रकल्पांतर्गत घेतलेल्या नालेरुंदीकरणामुळे गेल्या वर्षी पावसाळ्यात एकदाही रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली नव्हती, तसेच पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या संख्येतही लक्षणीयरीत्या घट झाल्याचे सांगितले. विशेषत: काही ठिकाणी तर जोरदार पावसामुळे पाणी साचले तर त्याचा निचरा होण्याबाबतची कार्यवाही त्वरित होते, यावरून महापालिका नालेसफाई व रुंदीकरणाची कामे समाधानकारकरीत्या झाली असल्याचे सांगितले.

