मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) सोशल मीडियाचा गैरवापर आता सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. अतिजलद संपर्काच्या या माध्यमातून आता समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सोशल मीडियाच्या वापरात झपाट्याने वाढ होत असून फेसबुक, व्हॉट्सअँपची पसंती वाढली आहे.सर्व युवा पिढी त्यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्यामधील देवाण-घेवाण होत असताना छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप, मेल पाठवणे, डाऊनलोडिंग इत्यादींचा वापर होत आहे. मात्र यामध्ये महापुरुष असो वा नेतेमंडळी असोत, यांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते अपलोड केले जातात. फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. त्यामुळे आज समाजात सतत काही ना काही कुरघोड्या होताना दिसत आहेत. त्यामुळे अशांतता निर्माण होत असून तोडफोड, मारहाण आदी प्रकारांमध्ये वाढ होते.
प्रत्येक राजकीय पक्षाकडून या गोष्टी उचलून धरल्या जातात. समाजकंटकांकडून घडवून आणलेल्या गोष्टींचा त्रास सर्वांनाच भोगावा लागत आहे. मोबाईल हा केवळ संपर्काचे साधन राहिले नसून त्याचा वापर आता सोशल मीडिया म्हणून जास्त होत आहे. सोशल मीडियाची भुरळ युवावर्गासाठी घातक ठरू लागली आहे. कमी खर्चात जास्त फायदा, तोही जलद गतीने मिळवून देणारी ही सेवा असल्याने तरुण व तरुणी या मीडियाच्या वापरात तासन्तास अडकून पडलेली दिसत आहेत. जीवनावश्यक गोष्टींपेक्षा महत्त्वाची गरज ती म्हणजे मोबाईल अशी वास्तविकता तरुण वर्गामधून दिसते. याद्वारेच मग अश्लील संदेश, घाणेरडे विनोद, अश्लील क्लिप्स डाऊनलोड करून त्यांची देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा प्रगतीपेक्षा अधोगतीकडे नेताना दिसत आहे. या गोष्टींचा वापर करताना समाजसंस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.

