अग्निशमन दलाची कमांड सेंटर धुळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाची कमांड सेंटर धुळीत

Share This
मुंबईकरांना अधिक चांगली सेवा पुरवता यावी यासाठी अग्निशमन दलाने मुंबईत सहा ठिकाणी कमांड सेंटर (मिनी मुख्यालये) उभारण्याचा निर्णय २००५ मध्ये घेतला. ही सेंटर उभी राहिलीही. पण आज तिथे सुरक्षा उपायांऐवजी आहे ते कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ७५ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या कमांड सेंटरमध्ये फर्निचर नसल्यामुळे ती बंदच असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. 
कोणत्याही मोठ्या दुर्घटनेनंतर मुंबईकरांपर्यंत मदतकार्य तातडीने पोहोचवता यावे यासाठी २६ जुलै २००५च्या महाप्रलयानंतर सहा कमांड सेंटर उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यानुसार भायखळा, वडाळा, मरोळ विक्रोळी, मानखुर्द, बोरीवली अशा सहा ठिकाणी ही सेंटर उभी राहिली. प्रत्येक कमांड सेंटरशी त्या विभागातील सहा ते सात अग्निशमन केंद्रे जोडली जातील, संपर्कापासून ते मदतकार्यापर्यंतचे नियोजन या सेंटरमधून केले जाईल, अशी त्यामागील कल्पना होती. २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तरी ही सेंटर तातडीने सुरू होतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र यापैकी कुठलेच सेंटर सुरू झालेले नाही. गेली अनेक वर्षे बंद असलेल्या कमांड सेंटरपैकी काही ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याचेही आरोप झाले. भायखळा मुख्यालयातील रहिवाशी इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कमांड सेंटरचा आधार घ्यावा लागला होता. आता ही कमांड सेंटर सुरू करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन आता मानखुर्द आणि बोरीवली येथील कमांड सेंटर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) ला देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. 

फर्निचरसह काही महत्त्वाच्या साधनसामग्री या कमांड सेंटर्समध्ये बसवण्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. पण यातील दोन सेंटर लवकरच सुरू होतील अशी माहिती डिव्हिजनल चीफ फायर ऑफिसर सुनील नेस्त्रीकर यांनी दिली. शिवाजी पार्क परिसरातील वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन १९९५ मध्ये एका शेडमध्ये छोटेसे फायर स्टेशन सुरू करण्यात आले. लवकरच हे स्टेशन अद्ययावत करण्यात येईल अशी घोषणा त्यावेळचे चीफ फायर ऑफिसर यांनी केली होती. पण आज या घटनेला १८ वर्षे उलटली आहेत. संपूर्ण विभागाने गगनचुंबी उंची गाठली पण फायर ब्रिगेड मात्र शेडमध्येच सुरू आहे! 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages