धोकादायक ठिकाणच्या घरांचे स्थलांतर करणे आवश्यक - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धोकादायक ठिकाणच्या घरांचे स्थलांतर करणे आवश्यक - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगराची दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मदत व बचावकार्य पूर्ण गतीने सुरू आहेत. या गावातील ४४ घरे बाधित झाली असून पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांचे स्थलांतर करून नागरिकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे आदेश सर्व महानगरपालिकांना देण्यात येणार आहेत. 
पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली होती.याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे ३00 जवान आधुनिक यंत्रसामुग्रीसह काम करत आहेत. दुर्घटनास्थळी जाणारे रस्ते अरुंद असल्याने आणि सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने यंत्रसामुग्री नेण्यात अडचणी आल्या. त्यावर मात करून रुग्णवाहिका आणि जेसीबी यंत्रे नेऊन काम सुरू करण्यात आले. तथापि या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. या ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सर्व ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

दुर्घटनेची माहिती घेणार
सह्याद्रीच्या पट्टय़ामध्ये अनेक ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला गावे वसलेली आहेत. वृक्षतोड, डोंगरमाथ्यावर होणारी बांधकामे आणि अन्य स्वरूपाच्या घडामोडींमुळे अधूनमधून दरडी कोसळण्याच्या लहान-मोठय़ा घटना घडतात. शेतीसाठी डोंगरमाथ्यावर सपाटीकरण केले जाते, याला पडकई असे म्हणतात. माळीण येथील घटना अशा प्रकारच्या कृत्यांमुळे झाल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबतही शहानिशा होणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास या संदर्भातील धोरण तयार करावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages