रेल्वे सुरक्षेची त्रिसूत्री कागदावरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे सुरक्षेची त्रिसूत्री कागदावरच

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि वाढणारी अपघातांची संख्या यामुळे उपनगरीय रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नेहमीच बोलले जाते. अपघात रोखण्यासाठी नेहमीच घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची कोणत्याही पद्धतीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. केंद्र सरकारकडून राकेश मोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक परिवहन विकास समिती नेमण्यात आली होती. या समितीने रेल्वे सुरक्षेसाठी त्रिसूत्रीची शिफारस केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसून ही शिफारस फक्त अहवालात कागदावरच राहिलेली आहे. 
२0१0-११ ते २0१२-१३ आणि १३-१४ (जानेवारीपर्यंत) या कालावधीतील आकडेवारी पाहिली असता ट्रेनची टक्कर होण्याच्या २0 पेक्षा अधिक घटना घडलेल्या आहेत. १७५ पेक्षा जास्त घटनांत ट्रेन रुळांवरून खाली घसरलेल्या आहेत. तर रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे झालेल्या मोठय़ा अपघातांचे प्रमाण १५८ एवढे होते. ट्रेनला आग लागण्याच्या १४ पेक्षा जास्त घटना घडलेल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून नेहमीच घोषणा केल्या जातात. दरवर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पातही तशी तरतूद करण्यात येते. मात्र अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात तर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठय़ा अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत.

केंद्र सरकारने देशातील वाहतुकीवरील अनेक मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय परिवहन विकास समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी राकेश मोहन आहेत. त्यांच्याकडून २0१४ च्या सुरुवातीलाच केंद्राला अहवाल सादर करण्यात आला आहे. त्या अहवालामध्ये रेल्वे सुरक्षेसाठी त्रिसूत्री योजना आखण्यात आली आहे. मात्र ती अद्याप कागदावरच आहे. या अहवालामध्ये राष्ट्रीय समिती, रेल्वे शोध आणि विकास परिषद यांची स्थापना करण्याची सूचना केलेली आहे. ही समिती आणि परिषद आपापल्या पद्धतीने रेल्वेच्या अपघातांचा शोध घेतील, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नही करतील, असे या अहवालात म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages