संविधानात बदल केल्यास देशभर रान पेटवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संविधानात बदल केल्यास देशभर रान पेटवणार

Share This
मुंबई : भारतीय संविधानाचे प्रास्ताविक हे सर्व भारतीय नागरिकांच्या सार्वभौमत्वाची सनद आहे. सत्ता आली म्हणून यामध्ये पाहिजे तसा बदल करणे ही घटनेची पायमल्ली आहे. अशा प्रकारे बदल करण्याविरोधात काँग्रेस रान पेटविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे.

विधानभवनात काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर त्यांनी ४२ वी घटना दुरुस्ती आणून महत्त्वपूर्ण बदल केले. त्याचवेळी त्यांनी संविधान प्रस्ताविकेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असे दोन शब्द घालून आमूलाग्र बदल घडवून आणला. पण आता मोदी सरकारने हे दोन्ही शब्द काढून टाकत जाहिरातबाजी केली. या सरकारवर कसा काय विश्‍वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी केला. या देशाला जर अराजकतेकडे घेऊन जायचे असेल तर त्यांना काय बोलायचे. यासंदर्भात काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीसुद्धा धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे दोन शब्द प्रास्ताविकेतून काढावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत विचारता विखे-पाटील म्हणाले की, शिवसेना नेत्यांची मागणी फार गंभीर घ्यायची गरज नाही. कारण ते सत्तेसाठी लाचार झालेले आहेत. त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवणार, हे स्पष्ट आहेच. तेव्हा शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल त्यांनी केला. राऊत यांच्या मागणीची त्यांनी खिल्ली उडवली. प्रास्ताविकेत बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती आणावी लागेल. पण तसे न करता मोदी सरकारची मनमानी सुरू आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत देऊ केलेली असून ती किती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली याचा आढावा घेण्यात येत आहे. मराठवाड्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना अधिक मदतीची गरज असून सरकारने याचा विचार करावा, याकरिता मुख्यमंत्र्यांना आमचे शिष्टमंडळ उद्याच भेटणार आहे, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages