मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेने १९९४ ते २०१४ साठी जाहीर केलेल्या विकास आराखड्यात पालिकेचे पुनर्वसन प्रकल्प राबवताना भांडवली मूल्याचा घोटाळा झाल्याचे दिलीप गायकवाड यांनी माहिती अधिकारातून उघड केले होते. दिलीप गायकवाड यांनी पालिकेचे आयुक्त तत्कालीन महापौर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही या घोटाळ्याबाबत कोणतीही कारवाईकरण्यात आलेली नव्हती. या घोटाळया बाबत पत्रकार अजेयकुमार जाधव यांचा JPN NEWS (web news ) मध्ये १ मार्च २०१५ व दैनिक जनतेचा महानायक मध्ये २ मार्च रोजी " भांडवली मूल्य घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा " हा लेख प्रसिध्द झाला होता. याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेत गृह विभागाचे सचिव के. पी. बक्षी यांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई महानगर पालिकेने १९९४ ते २०१४च्या विकास आराखड्यात १०४ पुनर्वसन प्रकल्प राबवताना पालिका अधिकाऱ्यांनी ४१ विकसकांचे भले करण्यासाठी भांडवली मूल्याची रक्कम व त्याचे व्याज वसूल केले नव्हते. या प्रकल्पातील ६२८ कोटी रुपयांचे भांडवली मुल्य विकासकांनी थकवले असून गेल्या १० ते १२ वर्षात दर साल १८ टक्के व्याजाने हि रक्कम सध्या ४५०० कोटी रुपये झाली आहे. पालिका अधिकारी हि रक्कम वसूल करण्यास टाळाटाळ करून विकासकांची व स्वताची घरे भरत आहेत. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीत हि रक्कम जमा झालेली नसल्याने भांडवली मूल्याचा ४५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी या लेखा मधून केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सदर लेख राज्याच्या गृह विभागाचे सचिव के. पी. बक्षी यांच्याकडे पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता हा लेख चौकशी साठी गृह विभागाकडे पाठवला असल्याने घोटाळ्यातील दोषी अधिकारी आणि विकासक यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
