मुंबई - पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईमध्ये देशाच्या कानाकोप-यातून लहान मुले आणली जातात, निदर्यपणे ती बालमजुरीमध्ये लोटली जातात. या मुलांना बालमजुरीमधून मुक्त करून मोकळे वातावरण देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीने सुरू झालेल्या बाल सहाय्य पोलीस केंद्राने पाच वर्षात २,६७६ मुलांना बालमजुरीतून मुक्त केले आहे.
‘प्रथम’ या सामाजिक संस्थेने पोलिसांच्या सहाय्याने २०१० ते जून २०१५ या कालावधीमध्ये बालकामगार विरोधी मोहीम राबवून बालकामगारांची सुटका केली आहे. या मुलांना बालमजुरीमध्ये लोटणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात आली आहे. लहान मुलांना परराज्यातून बालमजुरीसाठी मुंबईमध्ये आणून त्यांच्याकडून शारीरिक श्रमांची कामे करून घेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०१५ ते जून महिन्यांपर्यंत ९७ गुन्हे दाखल करून १३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच या कालावधीमध्ये २३४ बालकामगारांची सुटकाही करण्यात आली आहे.
इतर राज्यांतून मुंबईत येणा-या व बालमजुरीमध्ये लोटल्या जाणा-या मुलांचे प्रमाणही वाढते आहे, यापैकी अनेक मुलांना भीक मागण्यासाठी भाग पाडले जाते. बालभिकाऱ्यांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेता बाल सहाय्य पोलीस केंद्राने बालभिक्षेकऱ्यांना या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

