मुंबई दि.१५ ज्यांना दहावी - बारावीच्या परिक्षेत ५०%पेक्षा कमी गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता यशाचे अनेक मार्ग मेहनतीने गाठता येऊ शकतात, मनाचा आत्मविश्वास वाढवून करियरच्या पुढच्या वाटा निवडता येऊ शकतात. असा आत्मविश्वास देणारा करियर मंत्र घेऊन मुंबई भाजपा युवामोर्चा तर्फे संपूर्ण आठवडाभर मुंबईत ३६ ठिकाणी विशेष मार्गदर्शन शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत.
ज्यांना ८०%- ९०% गुण मिळतात अशा विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वजण करतात. मात्र ५०% आणि त्यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला कुटुंबासह समाजातून अवहेलनाच येते. अशा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन. करियरच्या नवनविन वाटा समजावून सांगणारा हा विशेष कार्यक्रम १४ जून पासून सुरू करण्यात आला असून मुंबईतील ३६ विधानसभा मतदार संघात येत्या आठवडाभरात विशेष शिबीरे भाजपा युवामोर्चा तर्फे घेण्यात येत आहेत. करियर मार्गदर्शक आनंद म्हापुस्कर यांच्यासारखे तज्ञ यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून कमी गुण मिळाले असतानाही ज्यांनी आयुष्याची अनेक शिखरे यशस्वी केली अशा यशस्वी व्यक्तींना सुद्धा यावेळी बोलावण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात येत असून मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे आणि युवामोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. रविवारी गोरेगाव येथून शिबीराला सुरूवात झाली तर आज चेंबूर, जोगेश्वरी, विलेपार्ले या मतदार संघात ही शिबीर घेण्यात आली. पुढील आठ दिवसात मुंबईतील अन्य विधानसभा मतदारासंघात अशी शिबीरे घेण्यात येणार आहेत .सुमारे ३००० विद्यार्थ्यांना एकाच वेळी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान याबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, भाजपाचे ‘सबका साथ सबका विकास’ हे घोषवाक्य आहे त्यामुळे समाजातील सर्व घटकांना घेऊन भाजप काम करते आहे, तरूण वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे. भाजपच्या सभासद मोहिमेमध्येही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे म्हणूनच या तरूण विद्यार्थी मित्रांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा हा उपक्रम ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

