मुंबई / प्रतिनिधी
पावसाळ्यात पसरणाऱ्या जलजन्य आजारांना प्रतिबंध व्हावा यासाठी खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडील पाणी नमुन्यांची चाचणी करण्याची मोहीम अधिक व्यापक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांत खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची चाचणी केली असता एकूण ५२० पाणी नमुन्यांपैकी ९१ म्हणजे एकूण १८ टक्के नमुन्यांमध्ये 'ईकोलाय' जीवाणू आढळून आले आहेत. 'ईकोलाय' जीवाणू मुळे ग्यास्ट्रो, जुलाब यासारखे जलजन्य आजार होतात. हि बाब लक्षात घेवून नागरिकांनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ आणि पाणी खाण्याबाबत अतिशय काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या ए वार्डच्या हद्दीत ८१ टक्के, सी वार्डच्या हद्दीत ६७ टक्के तर टी वार्डच्या हद्दीत ६० टक्के नमुण्यामध्ये 'ईकोलाय' जीवाणू आढळून आले आहेत. ज्या खाद्यविक्रेत्यांकडे 'ईकोलाय' जीवाणू आढळले आहेत त्यांच्यावर विभाग स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या ए विभागातील १३ खाद्यपदार्थ विक्रेत्यावर करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून उपायुक्त परिमंडळ १ यांच्या मान्यतानुसार या १३ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते, संबंधित विक्रेत्यांची दुकाने निष्कासित करण्याची कारवाई प्रस्तावीत करण्यात आली होती मात्र या कारवाईच्या विरोधात विक्रेते न्यायालयात गेल्याने पालिकेने कारवाईला स्थगिती दिली. न्यायालयाने प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याला दोन स्वतंत्र पाण्याचे पिंप ठेवण्यास सांगितले आहे. एका पिंपात मिनरल पाणी तर दुसऱ्या पिंपात भांडी आणि हात धुण्यासाठी पाणी ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र नुकत्याच केलेल्या पाण्याच्या चाचणीत 'ईकोलाय' जीवाणू आढळल्याने न्यायालयाला तसा अहवाल सदर करणार आहे असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ए विभागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या ४३ दुचाकी हात गाड्यांचे परवाने रद्द करण्यास वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. विहीर मालकांना आणि पाणी पुरवठादारांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विहिरीतील पंपाना सील करण्यात आले असून विजेचे कनेक्शन तोडण्यात आले असून विहिरी जवळ पाणी पिण्या योग्य नसल्याचे फलक लावले असल्याचे पालिकेने कळविले आहे.

