मुबंई ( प्रतिनिधी ) -- मुसळधार पाऊसामुळे विविध भागांत पाणी साचून मुंबई जलमय होऊ नये,यासाठी उभारण्यात आलेल्या वरळीतील पम्पिंग स्टेशनला रोज नालेसफाई करावी लागत आहे. कचरा टाकण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे रेसकोर्स परिसरातल्या झोपडीधारकांकडून रोजचा कचरा नाल्यात टाकला जातो. त्यामुळे आठवडयातुन दोन ट्रक कचरा पम्पिंग स्टेशनला काढावा लागत असताना पालिकेच्या घनकचरा विभागाकडून मात्र अद्याप कच-याचे व्यवस्थापन करण्यात आलेले नाही.
महापालिकेकडून चार महिन्यांपूर्वी वरळी येथे ११६ कोटी रुपये खर्च करुन लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन बांधण्यात आले. एकूण १० पंप असून एका पंपातून प्रत्येक सेकंदाला सहा हजार लिटर पाणी बाहेर फेकले जाते. गेल्या जून महिन्यांतील मुसळधार पावसाने जलमय होण्या-या मुंबईला या पम्पिंग स्टेशने वाचवले होते.मात्र साचणारे पाणी काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या या पम्पिंग स्टेशनला आता रोज कचराही काढावा लागत आहे. रेसकोर्स परिसरात सुमारे दोन हजारांहून अधिक झोपड्या आहेत.येथे रोजचा कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडून कचरापेट्या उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.येथे जमण्या-या कच-याची व्हिलेवाट पालिका करत नसल्याने रहिवासी बाजूच्या नाल्यात कचरा टाकतात. कच-याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे येथील नालेच डम्पिंग ग्राउंड झाले आहेत.
आठवडयातून दोन वेळा पम्पिंग स्टेशनचे दरवाजे उघडवे लागतात.यावेळी साठलेला दोन ट्रक कचरा बाहेर काढवा लागतो.जेव्हा पम्पिंग स्टेशन चालू केले जात नाही त्यावेळी हा कचरा समुद्रात व बाजूच्या चौपाट्यांवर जमा होतो. मागील दोन वर्षापासून ही बाब घनकचरा विभागाच्या लक्षात आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,अशी माहिती सुत्रांनी दिली.
