- उपचारानंतर १० जणांना घरी पाठविले
- अद्याप २० रूग्ण हॉस्पिटलमध्ये, यात ७ लहानमुलांचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी 28 Sep 2015
गणेशविर्सजनादरम्यान सरबत पिऊन जोगेश्वरी पुर्व येथे काही जणांना अन्नविषबाधा झाल्याच्या घटनेची गंभिर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी सूचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर पोलिसाना केली आहे.
जोगेश्वरी पुर्व येथील येथे गणरायाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या इंदिरा नगर येथील भक्तांना काही सामाजिक संस्थेद्वारे सरबत पाजण्यात आले. हे सरबत प्यायल्यानंतर काही जणांना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे सुमारे ३९ जणांना तातडीने जोगेश्वर पुर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील सुमारे १० जणांवर उपचार केल्यानंतर घरी सोडून देण्यात आले. सध्या २० जणांवर अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. यात १३ मोठी तर ७ लहामुलांचा समावेश आहे. ९ रुग्णांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तातडीने सोमवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये धाव घेत रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांशी भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर हॉस्पिटलकडून अन्नविषबाधा झालेल्या रूग्णांवर करण्यात येणार्या उपचाराची माहिती घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात यावी. अशी सुचनाही त्यांनी पोलिसांना केली आहे.
यांसदर्भात मेघवाडी पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता,‘रूग्णांच्या पोटातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी फ़ोरेन्सीक विभागाकडे पाठविण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.

