मुंबई / अजेयकुमार जाधव / ८ ऑक्टोबर २०१५
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन यादिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. डॉ. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे.
प्रत्येक शाळेतील तिसऱ्या इयत्तेपुढील प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन प्रेरणा दिनी किमान 10 छोटी पुस्तके (16 पानी) वाचावी. या बेताने मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय शिकवावी. जेणेकरुन प्रत्येक वर्षी वाचन प्रेरणा दिनी राज्यातील शाळांमध्ये 20 कोटी पुस्तके वाचली जातील, अशी योजना आहे. राज्यात सध्या 2.25 कोटी मुले शाळेत आहेत. त्यातील 1.85 कोटी मुले इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गामध्ये आहेत. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करणार आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाचनाची आवड व सवय निर्माण करणे या उपक्रमांसाठी जिल्हास्तरावर पाच लाख रुपये निधी उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ग्रंथमहोत्सवासाठी एक लाख रुपये प्रति जिल्हा उपलब्ध असून या निधीचा उपयोग उपरोक्त उपक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यासाठी उपयोगात आणता येणार आहे. सदर शासन परिपत्रक 7 ऑक्टोबर 2015 रोजी निर्गमित करण्यात आले असून ते महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या दिवशी नेमके काय करावे वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, प्रत्येक शिक्षकाने ऑक्टोबरअखेर डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविला जावा, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट द्यावीत, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ. कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेते व वाचन यांची उदाहरणे देऊन चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे असे विविध उपक्रम आणि या व्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करता येणार आहेत.
