मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महापालिकेने २०१४ पासून ६५२ सामुदायिक शौचकूपांची निर्मिती केली आहे. १३३४ सामुदायिक शौचकूपे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करणार असल्याचीही माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. पालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ अभियांनातर्गत पालकमंत्री सुभाष देसाई, उप महापौर अलका केरकर एत्यादी मान्यवरांच्या उपस्थित आयोजित कार्यक्रमात दराड़े बोलत होत्या.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ अभियांनातर्गत विभागामार्फत दिनांक २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर, २०१५ दरम्यान आयोजित स्वच्छता मोहीम पंधरवडा समारोप व ‘स्वच्छता अभियान चित्रकला व निबंध स्पर्धा २०१५-१६’ चा पारितोषिक वितरण समारंभ आज विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना पल्लवी दराडे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, मुंबईत दररोज ९५०० मेट्रीक टन कचऱयाची निर्मिती होते. क्षेपणभूमीचा प्रश्नही आहेच. घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत ‘बायोरिएक्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करुन कचऱयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा कांजूर प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. तेथे ३००० मेट्रीक टन कचऱयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
महापालिकेचे ‘बी’ व ‘सी’ प्रभाग स्वच्छता अभियानातील प्रयत्नांचा भाग म्हणून हागणदारीमुक्त झाले आहेत. इतर विभागही हागणदारीमुक्त करण्यावर पालिका भर देत आहे. स्वच्छता अभियान ही एक लोकचळवळ व्हावी, अधिकाधिक नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे यासाठी जनजागृतीवर पालिका भर देत आहे. या जनजागृती मोहिमेत विविध ठिकाणी पथनाट्यांचे प्रयोग सुरु आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
