मुंबई (प्रतिनिधी) – कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमुळे विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर परिसरातील रहिवाशांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी कचर्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने विक्रोळी परिसरातील नागरिकांनी सोमवारी डंपिंग ग्राऊंड परिसरात उत्स्फूर्त निदर्शने केली
कांजूरमार्गच्या डंपिंग ग्राऊंडवर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने उभारलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प वादात सापडला आहे. हा प्रकल्प सुरू होऊन त्यातून मिथेन वायूूची निर्मिती सुरू झालेली असल्यामुळे आता परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र प्रकल्प सुरू झालेला असला तरी दुर्गंधी कमी झालेली नाही. येथे कचर्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जात नसल्याचा दावा, नागरिकांनी केला आहे. २०१६ च्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, त्यानंतर दुर्गंधी पूर्ण बंद होईल, असा दावा पालिकेच्यावतीने केला जात आहे. मात्र आमच्यावर आता आणखी प्रयोग नको, हे डंपिंग ग्राऊंड ताबडतोब बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कचर्याच्या दुर्गंधीमुळे भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर, विक्रोळी परिसरातील लोकांना घरात राहणेही मुश्कील झाले आहे. वारा सुटला की तीव्र दुर्गंधी येते, पाऊस पडून गेल्यानंतर या परिसरात नाक मुठीत घेण्याशिवाय पर्याय नसतो असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
