मुंबई - शिवसेनेचा विरोध झुगारून मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाला संरक्षण देऊन कार्यक्रम यशस्वी केला. यामुळे शिवसेना-भाजपतील तणाव वाढला आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्य सरकारमधील आपल्या मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश देऊ शकतात.
एका इंग्रेजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आदेश उद्धव ठाकरे देऊ शकतात. पक्षाने सोमवारी या बाबत निर्णय घेतला असून, भाजप नेत्यांची वागणूक पाहता शिवसेनेने सत्तेत राहू नये, असा सल्ला पक्षाती काही नेत्यांनी दिला. भाजप काँग्रसेच्याच पावलावर पाऊल ठेवून पाकिस्तानबाबत निर्णय घेत आहे, असेही एका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटल्याचा दावा या वृत्तात केला आहे.
राज्यात शिवसेनेचे बोट धरून आतापर्यंत मार्गक्रमन करणाऱ्या भाजपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात त्याचा राजकीय धोका शिवसेनेलाच आहे. दरम्यान, शिवसेनेने विरोध केल्यानंतरही फडणवीस सरकारेन कुसरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सुरक्षा दिली. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यास आलेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर सेनेने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षात आणखी तणाव वाढला आहे.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात भाजपचे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेत असत. त्यामुळे दोन्ही पक्षांची वाटचाल समन्वयाने सुरू होती. पण, आता असे राहिले नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये दरी वाढत चालली आहे.
