१५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन
मुंबई / प्रतिनिधी
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ४ व ५ डिसेंबर रोजी जांभोरी मैदान वरळी येथे जाहीर अभिवादन सभा व पक्षाचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनात सामाजिक जनजागृती आणि आंबेडकरी आंदोलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती माने यांनी दिली.
दोन दिवसीय चालणाऱ्या अधिवेशनात जनता दल युनायटेडचे खासदार शरद यादव, उत्तर प्रदेश मधील माजी मंत्री दद्दूप्रसाद सिंग, दाऊराम रत्नाकर, डॉ. जयप्रकाश, शेकापचे जयंत पाटील, आरपीआयचे
अविनाश महातेकर, शामदादा गायकवाड, डॉ. राजेंद्र गवई, स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष व दैनिक जनतेचा महानायकचे संपादक सुनिल खोबरागडे, दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भाईजे, आवामी विकास पक्षाचे समशेर पठाण, संघराज रुपवते, माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सभेनंतर ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता चैत्यभूमी अभिवादन मार्च आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माने यांनी दिली.
पक्षाच्या वतीने १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चा दरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी चालू अधिवेशनात ठराव मंजूर करावा, सिंचन प्रकल्पामधील घोटाळ्याची चौकशी लवकरात लवकर करावी, ६० वर्षे झालेल्या शेतकरी शेतमजूर यांना ४ हजार पेन्शन द्यावी, खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावे, ओबीसी व विमुक्त जाती आरक्षणाकरिता क्रिमीलेयर नितिवर विचार करावा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, वनवासी शब्दावर कायमची बंदी घालावी, गरीब व गरजु मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, दलित आदिवासी वरील अन्याय अत्याचार थांबवावेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात इत्यादी मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चा दरम्यान सरकारच्या भांडवलदारी धोरणाचा आणि भारतात निर्माण केल्या जाणाऱ्या असहिष्णू वातावरणाचा निषेध केला जाणार असल्याची माहिती सुरेश माने यांनी दिली.

No comments:
Post a Comment