महापालिकेचे २०० अधिकारी आणि ६००० कर्मचारी कार्यरत
पुस्तकप्रेमींसाठी ३८९ पुस्तक विक्री स्टॉल्स
आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक म्हणून ०२२ – २४३९७८८८ कार्यरत करण्यात आला आहे.
मुंबई / अजेयकुमार जाधव
''उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे'' या शब्दातून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती कवीश्रेष्ठ शाहीर श्री.वामनदादा कर्डक यांनी यथार्थपणे वर्णन केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या महत्कार्यातून कोटी-कोटी कुळांचा उद्धार केला आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिशा दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असणारी अखंड श्रध्दा, नितांत आदर आणि अखंड प्रेम यापोटी संपूर्ण देशभरातून लाखो नागरिक दरवर्षी ०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आपले श्रध्दा सुमन अर्पित करीत असतात.
येत्या रविवारी म्हणजेच ०६ डिसेंबर २०१५ रोजी येणा-या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मुंबईत येणा-या लाखो अनुयायांना अधिकाधिक चांगल्या सोयी-सुविधा देता याव्या व त्यांचे मुंबईतील वास्तव्य अधिकाधिक सुखकर व स्मरणीय व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अहोरात्र कार्यरत असते. महापरिनिर्वाण दिनाच्या किमान तीन महिने आधीपासून या सर्व बाबींचे नियोजन करण्यात येत असते. या सेवा सुविधांसोबतच दिनांक ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत महापालिकेचे सुमारे २०० अधिकारी व ६,००० कर्मचारी चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात २४ तासांकरीता पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) कार्यरत असणार आहेत.
दि. ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधी दरम्यान महापालिकेद्वारे देण्यात येणा-या विविध सेवा सुविधां देण्यात येतात. यामध्ये शिवाजी पार्क परिसराच्या दक्षिण बाजूला ५०,१५० चौरस फूट निवासी मंडप व उत्तरेला ३८,५१४ चौरस फूटांचा निवासी मंडप याप्रमाणे एकूण ८८,६६४ चौरस फूट क्षेत्रफळाचा निवासी मंडप उभारण्यात आले आहेत. भंतेजीकरिता ७,६०० चौरस फूट क्षेत्रफळाचा मंडप व प्रार्थनेसाठी ४०० चौरस फूटांचा मंच उभारण्यात आला आहे. भंतेजीकरिता स्काऊट गाईड हॉल येथे १०० व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. १८,४०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भोजन मंडप उभारण्यात आला आहे. २००० चौरस फूट क्षेत्रफळामध्ये स्वागत कक्ष, वैद्यकीय सेवा, अग्निशमन नियंत्रण कक्ष, नियोजन कक्ष इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीस सेवा सुविधांसाठी सुमारे १०० डॉक्टर्स व १०० परिचारिका यांच्यासह आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. एखादी व्यक्तीची चुकामुक झाल्यास शोधणे सोपे व्हावे याकरिता चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात १०० फुट उंचीवर हवेत तरंगणा-या २ मोठ्या फुग्यांची व्यवस्था,तसेच फुग्यांच्याखाली उद्घोषण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४६९ तात्पुरत्या स्टॉल्सवर खाजगी आस्थापनांद्वारे विविध व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी ३८९ स्टॉल्स हे पुस्तक, कॅसेट्स सी.डी. / डी.व्ही.डी. इत्यादी विक्री संबंधीचे तर ८० स्टॉल्स हे खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
३,३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर पोलीस नियंत्रण कक्ष तसेच १,५२० चौरस फूट इतक्या जागेवर माहिती कक्ष निर्माण करण्यात आला आहे. एकूण १२ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले असून त्यापैकी ५ मनोरे शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात आले आहे. चैत्यभूमी परिसरात ५७२ चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर स्वागत कक्ष व शामियाना उभारण्यात आला आहे. एकूण १,२५० चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर तीन ठिकाणी रुग्णवाहीकेसह आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाजी पार्क परिसरात अतिदक्षता रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.
चैत्यभूमी येथून थेट प्रक्षेपण तसेच व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी यासाठी १७ व्हिडीओ कॅमेरे, २ साऊंड सिस्टिम, ५ प्लाज्मा टि.व्ही., ५ एल.ई.डी.स्क्रीन यासह ४५ कॅमे-यांसह क्लोज सर्किट टी.व्ही. लावण्यात आले आहेत. शिवाजी पार्क मैदान व ज्ञानेश्वर उद्यानामध्ये सुमारे ६५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे पत्र्याचे कूंपण घालण्यात आले आहे. धूळ माती पासून बचाव करण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर ९ ठिकाणी प्लास्टीक व ताडपत्रीचे आच्छादन करण्यात आले आहे. ५ ठिकाणी ध्वनीक्षेपण व्यवस्था, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) चार्ज करता यावे यासाठी १०० ठिकाणी चार्जिंग पॉइंट, पिण्याच्या पाण्चाच्या व्यवस्थेसाठी २७० ठिकाणी नळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नळांव्यतिरीक्त दररोज १५ पाण्याच्या टँकर्सद्वारे देखील पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था. या प्रत्येक टँकरमध्ये १०,००० लिटर्स इतके पिण्याचे पाणी उपलब्ध असणार म्हणजेच दररोज १,५०,००० लिटर्स इतके पाणी दररोज अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध होऊ शकणार आहे. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात १४ फिरती शौचालय (१४० शौचकुपे) उपलब्ध करून देण्यात आली आहे. रांगेत असणा-या अनुयायांसाठी ९ फिरती शौचालये (९० शौचकुप), समुद्र किना-याजवळ ९४ स्नानगृहे व ७५ शौचालयांची व्यवस्था तसेच शिवाजी पार्क परिसरात स्त्री व पुरूषांसाठी एकूण ११० स्नानगृहे निर्माण करण्यात आली आहेत.
१५ वाहने व १००० राखीव कामगारांसह संपूर्ण परिसरात स्वच्छता व्यवस्था नियोजन करण्यात आले आहे. २ अग्निशमन इंजिन, ४ बोटींसह जल सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात माहिती दर्शक फ्लेक्स / बॅनर्स / होर्डींग्ज / बोर्ड इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावर धूळ उडू नये म्हणून १४,००० चौरस मीटर आच्छादनांची व्यवस्था करण्यात आली आहे. २ ठिकाणी बेस्ट उपक्रमाद्वारे जनित्रांची (जनरेटर) व्यवस्था व आपत्कालीन कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार मुंबई अग्निशमन दलाद्वारे विविध ठिकाणी सुसज्ज व्यवस्था. यामध्ये जीवरक्षक वाहने, जीवरक्षक बोटी, जीवरक्षक, फायर इंजीन व संबंधित कर्मचारी, रुग्णवाहिका इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसही तयार
आपत्कालीन मार्ग व नकाशा १५ ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून बृहन्मुंबई पोलीस दलाचे १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, ८० पोलीस उपनिरीक्षक, १२०० पोलीस कार्यरत असून ४ शीघ्र पोलीस कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८ तुकड्या इत्यादींचे सहकार्य घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या संबंधित विभागांना देखील कळविण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment