विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोर उमेदवाराला मदत केल्याचा ठपका
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 31 Dec 2015
विधान परिषदे मुंबई महानगर पालिकेमधून दोन उमेदवार पाठवले जातात. या दोन जागांवरील शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्या जागा रिक्त होणार होत्या. रामदास कदम आणि भाई जगताप यांना त्यांच्या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली होती. शिवसेनेला भाजपाने तर काँग्रेसला राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता. परंतू या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनी बंडखोरी केल्याने निवडणुक चुरशीची झाली. आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा रंगली. निवडणुकीचा निकाल आल्यावर शिवसेनेला भाजपाने तर काँग्रेसला राष्ट्रवादीने दगा दिल्याचे उघड झाले.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी करण्याचे संकेत असताना मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाची साथ देत बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांना मदत केली. यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. नगरसेवकांनी पक्षाच्या अध्यक्षांचे निर्देश पाळले नसल्याने पालिकेतील गटनेते धनंजय पिसाळ यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आपल्या पक्षातील नगरसेवकांना बंडखोर उमेदवाराला मत देण्यापासून रोखण्यात गटनेते असलेल्या धनंजय पिसाळ अपयश आले आहे. यामुळे लवकरच धनंजय पिसाळ यांची पदावरून उचलबांगडी होणार आहे. धनंजय पिसाळ यांच्या जागी नव्या गटनेत्याची नेमणूक २०१५ च्या सुरुवातीलाच होणार होती. परंतू पिसाळ यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने पिसाळ यांचे गटनेतेपद वाचले होते. परंतू यावेळी धनंजय पिसाळ यांची उचलबांगडी करण्याचे पक्षाने नक्की केले आहे. पिसाळ यांच्या जागी पक्षातील जेष्ठ नगरसेविका सईदा खान किंवा नगरसेवक हारुन खान यांना गटनेते पदावर बसवण्याचा निर्णय पक्षातील नेत्यांनी घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

No comments:
Post a Comment