तंबाखू विकणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी बालगुन्हेगारी कायद्यात सुधारणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2016

तंबाखू विकणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी बालगुन्हेगारी कायद्यात सुधारणा

मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in  - शाळांजवळच्या 100 मीटर परिसरात बंदी घालूनही तंबाखूविक्रीला आळा घालणे सरकारला शक्‍य झाले नव्हते. सामाजिक संस्था आणि डॉक्‍टरांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तंबाखू विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी बालगुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. 

अधिसूचनेनुसार 15 वर्षांपेक्षा लहान मुलांना तंबाखू किंवा तंबाखूमिश्रित काहीही विकणे अथवा विकायला लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. या अधिसूचनेनुसार गुन्हेगाराला सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि एक लाखाचा दंड भरावा लागेल. तंबाखू विकणाऱ्यांवर अशी कडक कारवाई करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. 


या अधिसूचनेत तंबाखूबरोबरच झिंग आणणारे अन्य पदार्थही आहेत. यानुसार दारू, अफूचा अंश असलेली औषधे किंवा मानसोपचारासाठी देण्यात येणारी औषधे पदवीधर डॉक्‍टरशिवाय अन्य कुणी दिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
तंबाखूबंदीसाठी लढा देणारे टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी या अधिसूचनेतील बदलामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे सोपे होईल, असे सांगितले. कन्झम्शन ऑफ टोबॅको प्रोटेक्‍शन ऍक्‍टमुळे (कॉटपा) शक्‍य झाले नव्हते ते या अधिसूचनेमुळे करता येईल, असे ते म्हणाले.

सुमारे साडेसत्तावीस कोटी भारतीय तंबाखूचे सेवन करतात आणि त्यापैकी बहुतांश जण लहानपणीच तंबाखूचे सेवन करतात. ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हेनुसार भारतातील 20 टक्के मुले तंबाखूचे सेवन करतात. दररोज 5500 लहान मुले आणि तरुण तंबाखू खाण्याची सुरवात करतात. मृत्यूला निमंत्रण देणारी सहा ते आठ प्रमुख करणांचा तंबाखू जनक आहे. तंबाखूमुळे 40 टक्के जीवनशैलीशी निगडित आजार होतात. तंबाखूमुळे भारतात सुमारे 10 लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. यातील 70 टक्के मृत्यू हे उमेदीच्या वयात होतात. 90 हजार महिला आणि पाच लाख 80 हजार पुरुषांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. पुरुषांचे 50 टक्के कर्करोग आणि महिलांचे 20 टक्के कर्करोग तंबाखूमुळे होतात.

Post Bottom Ad